झुंजार सेनापती l मुंबई
पालिकेच्या निवडणुकीत अचाट धनशक्ती, सत्तेचा दबाव आणि यंत्रणेच्या ताकदीसमोर उभ्या ठाकलेल्या शिवशक्तीची ही थेट लढाई होती. अपेक्षित यश मिळालं नाही, हे मान्य आहे; मात्र “पराभवाने खचणार नाही, ही लढाई संपलेली नाही,” असा ठणकावून इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.
निकालानंतर ‘एक्स’वरील स्फोटक पोस्टमध्ये राज ठाकरे म्हणाले की, मराठी माणसाची, मराठी भाषेची आणि मराठी अस्मितेची ही केवळ निवडणूक नाही, तर अस्तित्वाची लढाई आहे. अशा लढाया दीर्घकाळ चालतात आणि त्या शेवटपर्यंत लढल्या जातात, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
राज ठाकरे यांनी सर्वप्रथम शिवसेना आणि मनसेच्या विजयी नगरसेवकांचे अभिनंदन करत, हे नगरसेवक सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील, असा विश्वास व्यक्त केला.
“मराठी माणसाच्या विरोधात काही घडलं, तर सत्ताधाऱ्यांना जेरीस आणल्याशिवाय राहणार नाही,” असा थेट इशाराही त्यांनी दिला.
यावेळची निवडणूक सोपी नव्हती. पैसा, सत्ता आणि व्यवस्थेच्या बळावर लढलेली ही निवडणूक होती. तरीही मनसेच्या उमेदवारांनी दिलेली झुंज अभिमानास्पद असल्याचं राज ठाकरे यांनी ठामपणे सांगितलं.
निवडणुकीत काय चुकलं, काय कमी पडलं आणि पुढची दिशा काय असावी, याचं सखोल आत्मपरीक्षण आणि आक्रमक कृती आराखडा लवकरच जाहीर केला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
“लवकरच पुन्हा भेटू… पुन्हा कामाला लागूया!”
— या शब्दांत राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना नव्या संघर्षासाठी सज्ज राहण्याचं आवाहन केलं.



