झुंजार सेनापती l मुंबई
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर आडोशी बोगद्याजवळ मंगळवारी (३ फेब्रुवारी) सायंकाळी ज्वलनशील रसायन वायू वाहून नेणारा टँकर उलटल्याने मोठी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली. टँकरमधून सुरू असलेल्या वायूगळतीमुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव प्रशासनाने महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवली. परिणामी तब्बल ३० तास द्रुतगती महामार्ग ठप्प राहिला.
या बंदमुळे द्रुतगती महामार्गासह जुना मुंबई-पुणे महामार्गही प्रभावित झाला. दोन्ही मार्गांवर मिळून सुमारे २५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. कोंडीत अडकलेल्या प्रवाशांमध्ये लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व रुग्णवाहिका यांचाही समावेश होता. अनेकांना रात्रभर वाहनांतच थांबावे लागल्याने संताप व्यक्त करण्यात आला.
अपघातानंतर अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक, पोलीस व एमएसआरडीसीचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. गॅसगळती रोखण्यासाठी तज्ज्ञ पथकांना पाचारण करण्यात आले. परिसरातील सुरक्षितता लक्षात घेऊन वाहतूक दोन्ही बाजूंनी बंद ठेवण्यात आली होती.
या गंभीर घटनेची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएसआरडीसीला सविस्तर चौकशीचे आदेश दिले आहेत. कोंडीमुळे निर्माण झालेली परिस्थिती, आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणेची कार्यक्षमता आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना याबाबत शिफारशींसह अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.



