■ मुंबई l झुंजार सेनापती
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २०२९ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना भक्कम करण्याचे स्पष्ट निर्देश देत पदाधिकाऱ्यांना आतापासूनच कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईत झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत त्यांनी संघटनाबांधणीला सर्वोच्च प्राधान्य देण्याची भूमिका मांडली.
या बैठकीत राज ठाकरे यांनी मुंबई अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना तातडीने प्रत्येक विभागातील पदाधिकाऱ्यांची संख्याबळ, महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती तसेच तरुण कार्यकर्त्यांचा सहभाग याबाबत सविस्तर माहिती गोळा करण्याचे निर्देश दिले. कोणकोणत्या ठिकाणी पदे रिक्त आहेत, विद्यमान पदाधिकाऱ्यांची कार्यप्रणाली कशी आहे आणि संघटनात्मक ताकद कुठे कमी पडते आहे, याचा सखोल आढावा घेण्यासही सांगण्यात आले.
“२०२९ ची निवडणूक जिंकायची असेल तर संघटना मजबूत करणे अपरिहार्य आहे. केवळ घोषणांनी चालणार नाही; नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे लागेल,” अशा शब्दांत राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना स्पष्ट संदेश दिल्याची माहिती पक्ष सूत्रांनी दिली. प्रत्येक विभागात सक्रिय यंत्रणा उभी करणे, नव्या कार्यकर्त्यांना संधी देणे आणि महिला-युवकांचा सहभाग वाढवणे यावर विशेष भर देण्याचे संकेतही त्यांनी दिले.
दरम्यान, आगामी काळात स्थानिक पातळीवरील प्रश्नांवर अधिक आक्रमक भूमिका घेऊन पक्षाची उपस्थिती जनतेत ठळकपणे जाणवेल, असेही बैठकीत सूचित करण्यात आले. या निर्देशांनंतर मनसे संघटनाबांधणीच्या मोहीमेवर अधिक वेगाने काम सुरू करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.



