■ झुंजार सेनापती l मुंबई
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीने प्राथमिक अहवाल सादर केला असून, वैमानिकाला धावपट्टीचा अचूक अंदाज न आल्याने आणि विमानात तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने ही दुर्घटना घडल्याचा निष्कर्ष नोंदवण्यात आला आहे. हा अपघात एका कारणामुळे नव्हे, तर मानवी आणि तांत्रिक त्रुटींच्या साखळीमुळे घडल्याचा प्राथमिक अंदाज अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
२८ जानेवारी रोजी जिल्हा परिषद निवडणूक प्रचारासाठी मुंबईहून बारामतीकडे जाणारे खासगी विमान लँडिंगदरम्यान कोसळून भीषण अपघात झाला होता. या दुर्घटनेत अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. घटनेनंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) तातडीने चौकशीचे आदेश दिले होते.
प्राथमिक अहवालानुसार, विमान उतरत असताना नियंत्रण प्रणाली किंवा इंजिनमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाली असावी. त्याचवेळी धावपट्टीचा अंदाज चुकल्याने वैमानिकाला योग्य वेळी नियंत्रण मिळवता आले नाही, अशी शक्यता नोंदवण्यात आली आहे. हवामान, दृश्यता आणि विमानतळावरील सुविधा यांचाही तपास सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
चौकशी समितीने विमानाचे तांत्रिक अवशेष, फ्लाइट डेटा आणि संवाद नोंदींचा अभ्यास सुरू ठेवला असून अंतिम अहवालात अधिक तपशील समोर येणार आहेत. या अपघातानंतर लहान विमानतळांवरील सुरक्षा यंत्रणा, प्रशिक्षण आणि तांत्रिक तपासणी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अंतिम अहवालानंतर जबाबदारी निश्चित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



