झुंजार सेनापती l मुंबई
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाबाबत केलेल्या एका पोस्ट मुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. “पाटील असावा पण पटेल नाही!” असं टोचणारे मत व्यक्त करत राज ठाकरेंनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वावर निशाणा साधला आहे.
राज ठाकरे यांनी दुसऱ्या पक्षाच्या अध्यक्षपदाबाबत केलेल्या वक्तव्यावरुन समाज माध्यमातून प्रतिक्रिया उमटत आहेत. स्वतःच्या पक्षाचे आमदार शून्य, खासदार शून्य आणि नगरसेवक बोटांवर मोजण्याइतके असताना, दुसऱ्या पक्षाच्या नेतृत्वावर उपदेश देणे हास्यास्पद असल्याची टीका राजकीय वर्तुळातून होत आहे.
विधानसभा, लोकसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मनसेची ताकद जवळपास नामशेष असताना, राज ठाकरे यांनी दुसऱ्या पक्षाच्या अंतर्गत नेतृत्व प्रक्रियेवर भाष्य करणे अनेकांना खटकले आहे. “ज्यांना जनतेने प्रतिनिधित्वच दिलेले नाही, ते इतर पक्षांना नेतृत्वाचे धडे देत आहेत,” अशी खोचक प्रतिक्रिया विरोधकांकडून व्यक्त होत आहे.
राज ठाकरेंची ओळख परखड भाषणांसाठी असली, तरी गेल्या काही निवडणुकांमध्ये मनसेला अपेक्षित यश मिळालेले नाही. अशा परिस्थितीत स्वतःच्या संघटनेच्या पुनर्बांधणीवर लक्ष देण्याऐवजी इतर पक्षांवर टीका करणे म्हणजे राजकीय आत्मविस्मरण असल्याचा आरोप टीकाकारांनी केला आहे.



