■ मुंबई l झुंजार सेनापती
मुंबई- पुणे द्रुतगती मार्ग वरील बहुप्रतिक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले असून हा मार्ग येत्या १ मेपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. या नव्या मार्गामुळे प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होणार असून विशेषतः घाट परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.
हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) यांच्या माध्यमातून पूर्ण केला जात आहे. प्रकल्पांतर्गत तयार करण्यात आलेला नवीन बोगदा १० किलोमीटरपेक्षा अधिक लांबीचा असून, तो देशातील महत्त्वाच्या दीर्घ बोगद्यांपैकी एक मानला जात आहे.
बोगदा सुरू झाल्यानंतर मुंबई–पुणे प्रवासाचा वेळ सुमारे २० ते २५ मिनिटांनी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इंधन बचत आणि प्रवासाचा ताण कमी होणार आहे.
मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव सर्व वाहनांना या बोगद्यातून प्रवेश दिला जाणार नाही. ज्वलनशील इंधन, धोकादायक रसायने आणि अतिज्वलनशील पदार्थ वाहून नेणाऱ्या टँकरना या मार्गावर बंदी घालण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय सुरक्षा नियमांनुसार बोगद्याला विशेष वर्गवारी देण्यात आली आहे.
दररोज सुमारे २००० इंधन टँकर या मार्गावरून प्रवास करतात. त्यामुळे संबंधित वाहनचालकांना नवीन नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. बोगद्यात अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा बसवण्यात आली असून प्रवेशद्वारांवर आधुनिक कॅमेरे आणि नियंत्रण प्रणाली कार्यरत असणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांची माहिती तात्काळ नियंत्रण कक्षाला मिळणार आहे.



