⬤ झुंजार सेनापती l प्रतिनिधी
मुंबई, दि. २० : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापासून विधान भवनातील प्रवेश व्यवस्थेत मोठा बदल करण्यात आला असून यापुढे छापील प्रवेशपत्रांना पूर्णविराम देण्यात आला आहे. सोमवार, २२ जूनपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात सर्वांना ई-प्रवेश आणि चेहरा पडताळणी पद्धतीद्वारेच प्रवेश दिला जाणार आहे.
विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्री, अधिकारी-कर्मचारी, स्वीय सहाय्यक, सचिव, विशेष कार्य अधिकारी तसेच इलेक्ट्रॉनिक आणि मुद्रित माध्यमांचे प्रतिनिधी अशा सर्वांसाठी ही नवी व्यवस्था लागू करण्यात आली आहे. यामुळे विधान भवन परिसरातील गर्दी नियंत्रणात ठेवणे आणि सुरक्षा तपासणी अधिक सुलभ करणे शक्य होणार आहे.
विधानमंडळ सचिवालयाकडून ई-ऑफिस प्रणालीद्वारे संबंधितांकडून आवश्यक माहिती मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून २० व २१ जून या सुट्टीच्या दिवशीही ही कार्यवाही सुरू राहणार आहे. यासंदर्भातील सविस्तर परिपत्रक सचिवालयाने जारी केले आहे.
नवीन ई-प्रवेश आणि चेहरा पडताळणी प्रणालीचा सर्व संबंधितांनी स्वीकार करून सुरक्षा यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन विधानमंडळ सचिवालयाने केले आहे.



