झुंजार सेनापती l बारामती | प्रतिनिधी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते अजित पवार यांचा बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे, अशी अधिकृत माहिती नागरी विमान उड्डाण महासंचालनालयाने (DGCA) दिली आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून राजकीय, सामाजिक व प्रशासकीय स्तरावर मोठा धक्का बसला आहे.
DGCA कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या चार्टर्ड विमानात एकूण पाच जण प्रवास करत होते. त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांचे सुरक्षारक्षक, एक फ्लाईट अटेंडंट तसेच दोन पायलट्स यांचा समावेश होता. अपघात इतका भीषण होता की विमानातील कोणीही जिवंत बचावले नाही.
अजित पवार हे बारामतीत होणाऱ्या आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी मुंबईहून बारामतीकडे विमानाने जात होते. त्यांच्या चार जाहीर सभांचे आयोजन बारामती तालुक्यात करण्यात आले होते. मात्र प्रचार दौऱ्याआधीच हा दुर्दैवी अपघात घडला.
हे विमान बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर लँडिंग करत असताना अपघातग्रस्त झाले. लँडिंगच्या वेळी तांत्रिक बिघाड झाला की अन्य कोणते कारण होते, याबाबत सध्या कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. अपघातानंतर तातडीने बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली होती, मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते.
या घटनेची DGCA आणि संबंधित विमान अपघात तपास यंत्रणेकडून सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. अपघाताचे नेमके कारण तपास अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.
अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक अनुभवी, प्रभावी आणि कर्तृत्ववान नेता गमावला आहे. त्यांच्या निधनावर राज्यभरातून शोक व्यक्त करण्यात येत असून अनेक नेत्यांनी आणि नागरिकांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.



