झुंजार सेनापती l मुंबई
पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीला मिळालेला विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या अकरा वर्षांच्या कामाचा परिणाम असल्याचे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केले. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
चव्हाण म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कष्टकरी, शेतकरी, शहरी आणि ग्रामीण अशा सर्वच घटकांसाठी सातत्याने काम केले. त्याच विश्वासामुळे जनतेने महायुतीच्या बाजूने कौल दिला आहे. आज जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. मात्र या निवडणुकीच्या मध्यंतरात आमचे नेते अजित दादा यांच्या अपघाती निधनाची दु:खद घटना घडली. हा महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का होता.”
ते पुढे म्हणाले, “निवडणुका मोठ्या असोत किंवा छोट्या, कार्यकर्त्यांच्या बळावर आणि विचारधारेच्या जोरावर विजय मिळवायचा असतो. अजित दादांच्या निधनानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सर्व कार्यकर्त्यांना मोठ्या सभा किंवा जल्लोष टाळण्याचे निर्देश दिले होते. बूथस्तरावर शांतपणे काम करत निवडणूक लढवण्याचे आवाहन करण्यात आले होते.”
गेल्या तीन वर्षांत देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दिवंगत अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रभावी काम झाले असल्याचा दावा करत चव्हाण म्हणाले, “बाराही जिल्हा परिषदांमध्ये महायुती सत्तेत येईल असे चित्र आहे. राज्यातील १२५ हून अधिक पंचायत समित्यांपैकी ५० पेक्षा जास्त ठिकाणी भाजप सत्ता स्थापन करेल. एकूणच सुमारे ८० टक्क्यांहून अधिक लोकप्रतिनिधी महायुतीचे निवडून येत आहेत. सर्व मतदारांचे महायुतीच्या वतीने मी मनःपूर्वक आभार मानतो.” असं प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी म्हटले आहे.



