मुंबई | सोमनाथ पाटील
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत असून, सुरुवातीलाच राजकीय वातावरण तापल्याचे चित्र आहे. इतिहासात प्रथमच विरोधी पक्षनेता नसताना हे अधिवेशन पार पडत असल्याने त्याकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे. अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापान कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकत सरकारविरोधात जोरदार भूमिका घेतली. राज्यातील वाढती महागाई, शेतकरी प्रश्न, बेरोजगारी, कायदा-सुव्यवस्था, आरक्षणाचे मुद्दे आणि विविध घोटाळ्यांचा पाढा वाचत विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली.
महाविकास आघाडीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत काही प्रमुख नेत्यांची अनुपस्थितीही चर्चेचा विषय ठरली. विशेषत: शरद पवार यांच्या गटाचा प्रतिनिधी उपस्थित नसल्याने राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले.
दरम्यान, हे अधिवेशन जवळपास महिनाभर चालणार असून अर्थसंकल्प मांडणी, विविध मागण्यांवरील चर्चा, तसेच विविध विधेयके यावर सविस्तर चर्चा अपेक्षित आहे. सत्ताधारी पक्षाकडून विकासकामांचा लेखाजोखा मांडण्याची तयारी सुरू असताना, विरोधक आक्रमक पवित्रा घेणार असल्याचे संकेत मिळत आहेत.



