■ झुंजार सेनापती l प्रतिनिधी
विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे उभी पिके आडवी झाली, तर बाजार समित्यांमध्ये उघड्यावर ठेवलेली धान्यांची हजारो पोती भिजून खराब झाली. अचानक कोसळलेल्या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले असून तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी होत आहे.
बाजार समित्यांतील गैरसोयी उघड
शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने आपला कृषीमाल बाजार समितीत आणला होता. मात्र सुरक्षित साठवणुकीची पुरेशी व्यवस्था नसल्याने धान्य उघड्यावर ठेवण्यात आले. पावसाच्या सरींनी ही पोती चिंब भिजली. “माल डोळ्यादेखत नष्ट झाला,” अशी प्रतिक्रिया संतप्त शेतकऱ्यांनी दिली.
यवतमाळात पूरसदृश्य स्थिती
यवतमाळ जिल्ह्यात कापूस, हरभरा, गहू, तूर आणि हळद पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. काही भागांत पावसामुळे पाणी साचून पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली. स्थानिक लोकप्रतिनिधींनी शासनाने तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी केली आहे.
हिंगोली–लातूरला झोडपले
हिंगोली जिल्ह्यातील वसम तालुक्यासह अनेक भागांत जोरदार पाऊस झाला. लातूर शहर आणि ग्रामीण भागात वादळी वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी किरकोळ गारपीटही झाली. अंतिम टप्प्यातील ज्वारी आणि इतर पिकांना फटका बसला.



