झुंजार सेनापती l प्रतिनिधी
मुंबई : विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळावा आणि कोणताही पात्र विद्यार्थी माहितीअभावी वंचित राहू नये, यासाठी प्रत्येक शाळेच्या दर्शनी भागात प्रमुख योजनांची माहिती असलेले तीन बाय चार आकाराचे फलक लावावेत, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.
शालेय शिक्षण विभागाच्या योजनांबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. राज्यात विद्यार्थ्यांसाठी अनेक शिष्यवृत्ती व कल्याणकारी योजना कार्यान्वित असल्या तरी त्यांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे शाळा प्रशासनाने पुढाकार घेऊन योजनांची ठळक माहिती प्रसिद्ध करावी, असे भुसे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना अंतर्गत अनाथ विद्यार्थी, दोन्ही पालक अपंग असलेले विद्यार्थी तसेच पॉक्सो कायदा अंतर्गत पीडित विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दरमहा २,२५० रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. महिला व बालकल्याण विभागामार्फत नियुक्त संस्थांनी अशा विद्यार्थ्यांचा शोध घेऊन संपूर्ण माहिती सादर करावी, असे निर्देशही देण्यात आले.
या योजनेची अंमलबजावणी जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत केली जाते. तसेच, कोरोना काळात सुरू करण्यात आलेली एकल पालक विद्यार्थ्यांसाठीची योजना आता नियमित स्वरूपात सुरू असल्याचेही मंत्री भुसे यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना शासन योजनांचा अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी शिक्षण विभागाने सक्रिय भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.



