झुंजार सेनापती l मुंबई
राज्यातील मच्छीमारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून स्वावलंबी बनविण्यासाठी शासन विविध योजनांच्या माध्यमातून प्रभावीपणे प्रयत्न करत असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली.
मंत्रालयात आयोजित बैठकीत विविध मच्छीमार संस्थांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना ते बोलत होते. या बैठकीत मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव रामास्वामी एन, महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले, राष्ट्रीय मत्स्य विकास मंडळाचे सदस्य प्रकाश एम. लोणारे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मंत्री राणे म्हणाले, पारंपरिक मासेमारीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून उत्पादनक्षमतेत वाढ करणे हा शासनाचा मुख्य उद्देश आहे. यासाठी अत्याधुनिक बोटी, जाळी तसेच कोल्ड स्टोरेज सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. याशिवाय प्रशिक्षण, कर्ज सुविधा आणि अनुदान योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे केली जात आहे.
किनारपट्टी भागातील पायाभूत सुविधांचा विकास, बंदरांचे आधुनिकीकरण आणि मत्स्य प्रक्रियेसाठी उद्योग उभारणी यावरही शासन विशेष लक्ष केंद्रित करत आहे. मच्छीमारांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांचे जीवनमान उंचावणे हे सरकारचे प्रमुख ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच युवकांनी गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसायाकडे वळावे, यासाठी विविध प्रोत्साहनपर योजना राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांमुळे राज्यातील मच्छीमार समुदाय अधिक सक्षम होईल आणि मत्स्य व्यवसायाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास मंत्री राणे यांनी व्यक्त केला.



