झुंजार सेनापती l प्रतिनिधी
नांदेड शहरात सुरू असलेल्या खुनांच्या मालिकेमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची पूर्णपणे लक्तरे वेशीवर टांगली गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अवघ्या तीन दिवसांत पाच जणांची निर्घृण हत्या झाल्याने नागरिक संतप्त झाले असून “गृहमंत्री झोपलेत का?” असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे.
दोन दिवसांपूर्वी भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सदा गँग आणि साई लाला गँगमध्ये वर्चस्वाच्या वादातून भीषण रक्तपात झाला. या तिहेरी हत्याकांडात अर्जितसिंह चव्हाण, मोहम्मद अरबाज आणि सय्यद आवेज यांचा जीव गेला. या घटनेने शहरात प्रचंड खळबळ उडाली होती.
त्यानंतर वजीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुरमुरा गल्ली येथे रज्जुसिंघ तबेलेवाले याची हत्या करण्यात आली. इतक्यावरच न थांबता आज सकाळी सोनू कल्याणकर या तरुणाचाही खून करण्यात आला. सलग घडणाऱ्या या घटनांमुळे गुन्हेगारांचा पोलिसांवर कोणताही धाक उरलेला नसल्याचे स्पष्ट होत आहे.
नांदेडमध्ये निर्माण झालेल्या या भयावह परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण असून प्रशासनाविरोधात संताप उसळला आहे. तात्काळ कठोर कारवाई करून गुन्हेगारांना जेरबंद करण्यात यावे, अन्यथा परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.



