spot_img
spot_img

राज्यातील शासकीय इमारतींवर सौर ऊर्जा संयंत्रणा बसवणार

   अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे

झुंजार सेनापती l मुंबई

राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या शासकीय कार्यालयीन इमारती व विश्रामगृहांवर सौर ऊर्जा संयंत्रणा बसविण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबतचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केला आहे. राज्याच्या अपारंपारिक ऊर्जा धोरण २०२० अंतर्गत इमारतींच्या छतांवर सौर ऊर्जासंच प्रकल्प उभारण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या प्रकल्पांमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय इमारती, कार्यालये आणि विश्रामगृहांवरील वीज खर्चात अंदाजे ४० टक्के बचत होणार असल्याचे अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी सांगितले.

अपारंपरीक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पी.एम. सूर्यघर योजनेअंतर्गत शासकीय इमारतींवर रुफटॉप सौर प्रकल्प उभारणीबाबत बैठक झाली. या बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, सचिव आबासाहेब नागरगोजे, उपसचिव निरंजन तेलंग उपस्थित होते.

 बैठकीत ‘पी.एम. सूर्यघर मुफ्त बिजली योजना’ अंतर्गत राज्यातील सर्व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय इमारतींच्या छतांवर रुफटॉप सौर संयंत्रणा बसविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मंत्री अतुल सावे म्हणाले, केंद्र शासनाच्या पी.एम. कुसुम योजना आणि पी.एम. सूर्यघर योजनांच्या माध्यमातून लहान घरांनाही अनुदान देऊन सौर ऊर्जेचा वापर वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. रुफटॉप सौर प्रकल्प उभारणीच्या बाबतीत महाराष्ट्र सध्या देशात दुसऱ्या क्रमांकावर असून, राज्य लवकरच प्रथम क्रमांक गाठेल, असा विश्वास मंत्री अतुल सावे यांनी यावेळी व्यक्त केला.

 सौर ऊर्जेचा वापर वाढविल्यास पारंपारिक ऊर्जेवरील अवलंबन कमी होऊन दीर्घकालीन ऊर्जा व्यवस्था निर्माण होईल. राज्यातील वाढती वीज मागणी लक्षात घेता, नवीन व नवीकरणीय ऊर्जेचा वापर अपरिहार्य झाला आहे. सौर ऊर्जा हा सर्वाधिक उपलब्ध ऊर्जेचा स्त्रोत आहे. शासनाचे लक्ष्य प्रत्येक शासकीय इमारत ऊर्जास्वावलंबी बनविणे आणि स्वच्छ ऊर्जेच्या वापराला चालना देणे असल्याचे मंत्री सावे यांनी सांगितले.

Related Articles

जीएसटी अधिकारी मृत्यू प्रकरण; मुख्य आरोपी प्रदीप फाटे पुण्यातून अटकेत

झुंजार सेनापती l मुंबई बीड जिल्ह्यातील वस्तू व सेवा कर विभागाचे अधिकारी सचिन नारायण जाधवर यांच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांना महत्त्वाचे यश मिळाले आहे. या प्रकरणातील...

आखाती देशांतील तणाव; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी राज्य सरकार सतर्क

झुंजार सेनापती l मुंबई आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षेबाबत राज्य सरकारने तातडीने पावले उचलली आहेत. मुख्यमंत्री Devendra Fadnavis...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!