झुंजार सेनापती l मुंबई | प्रतिनिधी
राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित करत असून, या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्यावर शासनाचा भर असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.
राज्यात उत्पादित झालेल्या डाळिंबाचे तीन कंटेनर वाशी येथील निर्यात सुविधा केंद्रातून के. बी. एक्सपोर्ट्सचे चेअरमन प्रकाश खाखर यांच्या माध्यमातून ब्रिस्बेन (ऑस्ट्रेलिया) तसेच न्यूयॉर्क व लॉस एंजेलिस (अमेरिका) येथे नुकतेच रवाना करण्यात आले. या यशस्वी निर्यातीबद्दल पणन मंत्री रावल यांनी प्रकाश खाखर यांचे अभिनंदन केले.
जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी सातत्याने वाढत असून अमेरिका, ऑस्ट्रेलियासह अनेक देशांत राज्यातील डाळिंबाची निर्यात होत आहे. टप्प्याटप्प्याने इतर फळांच्या निर्यातीसाठीही पणन विभाग प्रयत्नशील आहे. यामुळे फळे व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेत योग्य व स्पर्धात्मक दर मिळण्यास मदत होईल, असे मंत्री रावल यांनी स्पष्ट केले.
अमेरिका, ऑस्ट्रेलियासह विविध देशांमध्ये कंटेनरद्वारे निर्यात सुरू होणे हे राज्याच्या कृषी निर्यात धोरणासाठी आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी महत्त्वाचे पाऊल असून, येत्या काळात निर्यात सुविधा केंद्रातून मोठ्या प्रमाणावर डाळिंब निर्यात केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.



