झुंजार सेनापती l मुंबई
महापालिका निवडणुकांत महायुतीने ऐतिहासिक यश मिळवत राज्यातील राजकीय चित्रच बदलून टाकले आहे. शुक्रवारी जाहीर झालेल्या २९ महापालिकांच्या निकालात २४ महापालिकांवर भाजप–शिंदेसेना युतीने स्पष्ट वर्चस्व सिद्ध केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा ‘विजयी बँड’ पुन्हा एकदा दिग्विजयी ठरला आहे.
भाजपने जवळपास ९ महापालिकांमध्ये स्वबळावर सत्ता मिळवली असून उर्वरित ठिकाणी महायुतीतील मित्रपक्षांच्या साथीने सत्ता स्थापन केली जाणार आहे. काही महापालिकांमध्ये अजित पवार गटाच्या पाठिंब्याची गरज भासणार असली तरी एकूण निकाल महायुतीच्या बाजूनेच झुकलेले आहेत.
नगरपालिका निवडणुकांप्रमाणेच महापालिकांमध्येही भाजप सर्वाधिक जागा मिळवणारा राज्यातील नंबर वन पक्ष ठरला आहे. बहुतांश ठिकाणी भाजपच्या जागा मागील निवडणुकीपेक्षा लक्षणीय वाढल्या आहेत.
दुसरीकडे, उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट यांचे अस्तित्वच या निवडणुकीत जाणवले नाही. अजित पवार गटाची कामगिरीही अपेक्षेप्रमाणे न राहता मर्यादित ठरली. काँग्रेसची कामगिरी मागील वेळेपेक्षा सुमारच राहिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निकालांवर प्रतिक्रिया देताना सांगितले की,
“आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन जनतेकडे गेलो आणि जनतेने आम्हाला भरभरून पाठिंबा दिला. वेगवेगळ्या शहरांमध्ये मिळालेले बहुमत हे लोकांना कार्यक्षम आणि निर्णायक कारभार हवा आहे, हेच दर्शवते.”
दरम्यान, मुंबई महापालिकेच्या मतमोजणीचे अंतिम चित्र उशिरापर्यंत स्पष्ट होत असले तरी मिळालेल्या प्राथमिक निकालांनुसार महायुती सत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे. ठाकरे बंधू – उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे – यांची राजकीय पकड यावेळी कमकुवत झाल्याचेही स्पष्ट दिसत आहे.



