⬤ झुंजार सेनापती l मुंबई / बीड

बीड तालुक्यातील ब्र. ल. पा. तांदूळवाडी (घाट) तलावाची पाणी साठवण क्षमता वाढविणे,तांदूळवाडी घाट व खडकी घाट, येथील शेतकऱ्यांचा प्रलंबित मावेजा देणे, तलावाच्या मुख्य भिंतीचे संरक्षण करणे तसेच सावरगाव घाट गावासाठी संरक्षण भिंत उभारण्याच्या मागण्यांसाठी संपादक सोमनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली ३० जूनपासून आमरण उपोषण करण्यात येणार आहे. यासंदर्भातील अधिकृत निवेदन जिल्हाधिकारी बीड यांच्यासह संबंधित विभागांना सादर करण्यात आले आहे.
१५५ हेक्टर सरासरी जलक्षेत्र असलेला पाटबंधारे विभागाचा तांदूळवाडी (घाट) तलाव हा बालाघाट व परिसरातील गावांसाठी अत्यंत महत्त्वाचा जलस्रोत मानला जातो. या तलावाची पाणी साठवण क्षमता वाढविल्यास बालाघाट परिसरातील अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असून परिसरातील हजारो शेतकऱ्यांसाठी हा तलाव मोठे वरदान ठरणार आहे.
दुष्काळ सदृश परिस्थितीत अवघ्या काही महिन्यांत तलाव कोरडा पडल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. तलावातील पाणी पातळीच्या तांत्रिक नोंदी आणि प्रत्यक्ष जलसाठ्यामध्ये मोठी तफावत असल्याचे दिसत असुन जलसाठा वाढवण्यासाठी शासन स्तरावरून जलसंधारण चे काम करण्यात यावे असे निवेदन देण्यात आले आहे.
तलावाच्या मुख्य भिंतीवर वाढलेल्या झाडांमुळे भविष्यात भिंतीला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून ती झाडे तात्काळ हटवून दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर तलावाचे शास्त्रोक्त पद्धतीने खोलीकरण करून साठवण क्षमता वाढविणे, शेतकऱ्यांना मोफत गाळ उपलब्ध करून देणे, सावरगाव घाट गावाला संरक्षण भिंत उभारणे तसेच लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर ठिबक सिंचन योजना देण्याची मागणी करण्यात आली आहे.
तलाव परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्याचीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तलावाभोवती झाडे लावल्यास बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, पर्यावरण संवर्धन होईल आणि जलसाठा अधिक काळ टिकून राहण्यास हातभार लागेल, असे आंदोलकांचे म्हणणे आहे.
याशिवाय तलावाच्या पाणी साठ्याचे तांत्रिक सर्वेक्षण करून वस्तुस्थिती जाहीर करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास ३० जूनपासून तांदूळवाडी (घाट) तलावाच्या कोरड्या पात्रात आमरण उपोषण सुरू करण्यात येणार असल्याचे संपादक सोमनाथ पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
या आंदोलनाला परिसरातील बाधित शेतकरी, ग्रामस्थ आणि जलसंवर्धनाबाबत जागरूक नागरिकांचा पाठिंबा मिळत आहे.



