झुंजार सेनापती l मुंबई
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत अटीतटीची लढत पाहायला मिळाली. भाजप आणि शिंदे गटाने पैसा, दडपशाही, शासकीय यंत्रणांचा वापर आणि कथित हेराफेरीचे सर्व डाव खेळूनही मुंबईत ठाकरे बंधूंचा राजकीय दरारा कायम राहिल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
मुंबईच्या रक्षणासाठी मराठी माणूस ठामपणे ठाकरे बंधूंसोबत उभा राहिला. शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेससह शिवशक्तीला मराठीबहुल भागांतून भरघोस मतदान मिळाले. यामुळे शिवसेनेचे पारंपरिक बालेकिल्ले अभेद्य राहिले, तर ठाकरे गटाची ताकद पुन्हा अधोरेखित झाली.
दुसरीकडे, अमराठीबहुल परिसरांतून भाजप आणि शिंदे गटाला मोठे बळ मिळाले. त्यामुळे महायुती आणि शिवशक्ती यांच्यात बहुमतासाठी जबरदस्त रस्सीखेच रंगली होती. सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेला ११४ हा जादुई आकडा गाठण्यासाठी अखेरपर्यंत तणाव कायम होता.
अखेर २२७ जागांचे संपूर्ण चित्र स्पष्ट झाले असून महायुतीने ११८ जागांसह काठावरचे बहुमत मिळवले आहे. मात्र, आकड्यांच्या या खेळातही मुंबईने ठाकरे बंधूंचा राजकीय प्रभाव आणि मराठी मतदारांची ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.



