मुंबई l झुंजार सेनापती
अजित दादा पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यावरून सुरू झालेल्या राजकीय वादात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी शिवसेना (शिंदे) नेते रामदास कदम यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. “दगड चिखलात मारणं म्हणजे आपल्या अंगावरच चिखल उडवणं,” असं म्हणत त्यांनी कदमांच्या टीकेकडे दुर्लक्ष करण्याचा सूर लावला.
रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्यावर “गलिच्छ राजकारण” केल्याचा आरोप करत सुनेत्रा पवारांना घाईघाईत शपथ देण्यात आल्याची टीका केली होती. यावर प्रतिक्रिया देताना तटकरे म्हणाले, “रामदास कदम यांनी जे वक्तव्य केलं आहे त्यावर मला जास्त बोलायचं नाही. टीका करायची असेल तर त्यांनी जरूर करावी. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीत ४१ जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे पक्षाचे निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आम्हाला आहे.”
तटकरे यांनी यावेळी कदमांच्या पक्षांतरावरही अप्रत्यक्ष टोला लगावला. “रामदास कदमांनी मातोश्री का सोडली? नंतर इतरांची साथ का धरली? हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आम्ही कधी त्याबद्दल विचारलं का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला



