झुंजार सेनापती l मुंबई
राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकांची मतमोजणी आज होणार असून ग्रामीण भागातील सत्तेचे समीकरण स्पष्ट होणार आहे. सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून सर्व केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने मतमोजणीसाठी काटेकोर नियोजनाचे निर्देश दिले आहेत.
दुपारपर्यंत बहुतांश निकालांचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांसाठी ७,४३८ उमेदवार रिंगणात असून अनेक ठिकाणी चुरशीची लढत झाली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या १२ जिल्ह्यांत एकूण ६८.२८ टक्के मतदान झाले.
परभणी जिल्ह्यात सर्वाधिक ७४.८९ टक्के मतदानाची नोंद झाली, तर रत्नागिरी जिल्ह्यात सर्वात कमी ५५.७९ टक्के मतदान झाले होते. ग्रामीण मतदारांनी दिलेला कौल कोणाच्या बाजूने जाणार याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.



