झुंजार सेनापती l मुंबई : भीमा नदीवरील उजनी जलाशयात गोड्या पाण्यातील जैवविविधता पुनर्संचयित करण्यासाठी महाराष्ट्र मत्स्य विभागाने Bombay Natural History Society (बीएनएचएस) यांच्या सहकार्याने सुमारे १२.२ दशलक्ष मत्स्यबीज जलाशयात सोडण्यात आले.
तिलापिया या परप्रांतीय व घातक माशांच्या वाढत्या संख्येमुळे स्थानिक प्रजातींना धोका निर्माण झाला होता. मात्र, बीएनएचएसच्या अलीकडील अभ्यासानुसार तिलापियाची संख्या ३० ते ४० टक्क्यांनी घटली असून, हीच योग्य संधी साधत रोहू, मृगल आणि कटला या स्थानिक व आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या प्रजातींचे मत्स्यबीज सोडण्यात आले.
मत्स्यबीज जलाशयापर्यंत सुरक्षित पोहोचवण्यासाठी ऑक्सिजनयुक्त विशेष टाक्यांचा वापर करण्यात आला. फिशरीज तज्ज्ञांच्या देखरेखीखाली शास्त्रीय पद्धतीने विसर्ग प्रक्रिया पार पडली. या उपक्रमामुळे गोड्या पाण्यातील अन्नसाखळीचे संतुलन राखण्यास मदत होणार असून, स्थानिक मच्छिमारांच्या उत्पन्नातही वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
यावेळी बीएनएचएसचे डॉ. उन्मेष काटवटे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. तसेच Cipla Foundation यांच्या सहकार्याने जून-जुलै महिन्यात १२ दुर्मीळ व स्थानिक प्रजातींच्या संवर्धनाचा विशेष कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.



