spot_img
spot_img

मांजरसुंबा घाटात कुटुंबाला ओलीस ठेवून दरोडा टाकणारे दरोडेखोर जेरबंद

नेकनूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

झुंजार सेनापती | मुंबई

बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा घाट परिसरात कुटुंबासह प्रवास करणाऱ्या व्यक्तीला अडवून कोयत्याचा धाक दाखवत दरोडा टाकणे, अपहरण करून विविध ठिकाणी बेकायदेशीररीत्या डांबून ठेवणे तसेच एटीएम कार्ड आणि ऑनलाइन बँकिंगचा गैरवापर करून सुमारे १ लाख ८० हजार रुपयांची लूट करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात नेकनूर पोलिसांनी केला आहे. या प्रकरणातील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. उर्वरित आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
दि. ९ जुलै २०२६ रोजी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २७७/२०२६ भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
फिर्यादी श्रीपाद कृष्णाजी कुलकर्णी (रा. भूम) हे आपल्या कुटुंबासह चारचाकी वाहनातून प्रवास करत असताना मांजरसुंबा घाट परिसरात आरोपींनी त्यांच्या वाहनाचा पाठलाग करून वाहन आडवे लावत जबरदस्तीने थांबविले. त्यानंतर कोयत्याचा धाक दाखवत फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण करण्यात आली तसेच जीवे मारण्याची धमकी देत सोन्याची अंगठी, रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू लुटण्यात आल्या.
याचदरम्यान आरोपींनी फिर्यादीचे एटीएम कार्ड ताब्यात घेऊन पासवर्ड मिळविला. त्यानंतर खात्यातून रोख रक्कम काढण्यात आली. तसेच मोबाईलवरील ऑनलाइन बँकिंग सुविधेचा गैरवापर करून विविध व्यवहारांद्वारे मोठी रक्कम हस्तांतरित करण्यात आली. आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना इच्छेविरुद्ध विविध ठिकाणी नेऊन बेकायदेशीररीत्या डांबून ठेवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या गंभीर गुन्ह्याचा वेगाने तपास करून दोन आरोपींना जेरबंद करण्यात नेकनूर पोलिसांना यश आले असून उर्वरित आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

महाराष्ट्रात समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणी प्रक्रियेला सुरवात

झुंजार सेनापती | मुंबई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत घोषणा करत राज्यात समान नागरी कायद्याचा (UCC) मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई...

ड्रायव्हिंग लायसन्ससाठी १ ऑगस्टपासून अधिवास प्रमाणपत्राची सक्ती

झुंजार सेनापती l मुंबई  राज्यात वाहनचालक परवाना मिळविण्यासाठी १ ऑगस्ट २०२६ पासून नवीन नियमावली लागू करण्यात येणार असून त्यानुसार महाराष्ट्र अधिवास (डोमिसाइल) प्रमाणपत्र अनिवार्य...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!