झुंजार सेनापती l नवी दिल्ली
चीनची घुसखोरी, भारत-अमेरिका व्यापार करार आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चेपासून सरकार पळ काढत असल्याचा आरोप करत इंडिया आघाडीतील पक्षांनी आज लोकसभेत जोरदार गोंधळ घातला. “हुकूमशाही खपवून घेणार नाही”च्या घोषणांनी सभागृह दणाणून गेले. काँग्रेससह विरोधी पक्षांचे खासदार वेलमध्ये उतरल्याने कामकाज अवघ्या दहा मिनिटांत गुंडाळावे लागले.
गुरुवारी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली होती. लोकसभेत अनुपस्थितीबाबत अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद आज उमटले.
माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे पुस्तक, भारत-अमेरिका व्यापार करार आणि एपस्टीन फाईल्स या मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक झाले. कामकाज सुरू होताच घोषणाबाजी सुरू झाली. “सभागृह चालविण्याचा तुमचा काही मानस दिसत नाही,” अशी टिप्पणी करत अध्यक्षांनी सुरुवातीला कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब केले. पुन्हा बैठक सुरू होताच ‘संविधान बचाव’च्या घोषणा देत विरोधकांनी गदारोळ कायम ठेवला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून अध्यक्षांनी कामकाज सोमवारपर्यंत तहकूब केले.
दरम्यान, चीन घुसखोरीच्या मुद्द्यावरून पंतप्रधानांनी “जे योग्य वाटते ते करा” असा सल्ला दिल्याचा उल्लेख करत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर पुन्हा निशाणा साधला.



