झुंजार सेनापती l अमरावती (प्रतिनिधी) : शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर महिलांसह नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असतानाच आता न्यायाधीशही सुरक्षित नसल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. अमरावती जिल्ह्यात पाच न्यायाधीश आणि चार न्यायालयीन कर्मचाऱ्यांची घरे चोरट्यांनी फोडल्याची घटना घडली. शनिवारी मध्यरात्री कांतानगर भागातील न्यायाधीशांच्या वसाहतीत पोलिसांचा बंदोबस्त असतानाही चोरट्यांनी एकूण नऊ घरांची कुलपे तोडून चोरी केली. या प्रकारामुळे सुरक्षेच्या दाव्यांची पोलखोल झाल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
चोरीचा घटनाक्रम
कांतानगर भागात न्यायाधीश व न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या दोन वसाहती आहेत. नलदमयंती वसाहतीतील तीन न्यायाधीशांच्या घरांवर प्रथम डल्ला मारण्यात आला. त्यानंतर पैनगंगा इमारतीतील दोन न्यायाधीशांची घरे फोडण्यात आली. न्यायाधीशांच्या घरांमागील वसाहतीतील चार कर्मचाऱ्यांची घरेही चोरट्यांनी लक्ष्य केली. या घटनेमुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आधीच ‘रेकी’ केल्याचा संशय
सुट्टीच्या काळात न्यायाधीश बाहेरगावी जातात, याची माहिती मिळवून चोरट्यांनी आधीच परिसराची ‘रेकी’ केल्याचा संशय व्यक्त होत आहे. कुलूप असलेली घरे अचूक हेरून चोरी केल्याने हा संशय अधिक बळावला आहे. चोरट्यांनी वसाहतीच्या मागील बाजूने झुडपांचा आधार घेत भिंत ओलांडून पलायन केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहे. नऊ घरांतून नेमका किती ऐवज चोरीला गेला, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.



