झुंजार सेनापती l मुंबई
अंबादास दानवे यांना देण्यात आलेली ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा राज्य सरकारने काढून घेतली आहे. महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेचे नियतकालिक पुनरावलोकन करणाऱ्या समितीच्या अहवालानुसार गृह विभागाने हा निर्णय घेतल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे.
दानवे यांचा विधान परिषद सदस्यत्वाचा कालावधी सुमारे पाच महिन्यांपूर्वी संपुष्टात आला आहे. तसेच ते सध्या विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदावरही नाहीत. पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर सुरक्षेचे पुनर्मूल्यांकन करण्याची पद्धत असून, त्यानुसारच त्यांची ‘वाय प्लस’ सुरक्षा मागे घेण्यात आल्याचे गृहमंत्री (ग्रामीण) पंकज भोयर यांनी स्पष्ट केले.
राज्यातील महत्त्वाच्या राजकीय व्यक्तींना धोका मूल्यांकनाच्या आधारे विविध स्तरांवर सुरक्षा पुरवली जाते. ‘वाय प्लस’ सुरक्षा श्रेणीत सशस्त्र पोलीस जवान, एस्कॉर्ट वाहन आणि इतर सुरक्षा उपायांचा समावेश असतो. मात्र, पद व धोका पातळी यानुसार ही सुरक्षा वेळोवेळी बदलली जाते.
दरम्यान, दानवे यांची सुरक्षा काढल्याच्या वृत्तामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. विविध राजकीय आणि सामाजिक विषयांवर आक्रमक भूमिका मांडणारे नेते म्हणून दानवे यांची ओळख आहे.



