झुंजार सेनापती l मुंबई
महिलांसाठी ५० टक्के तिकिट सवलत आणि ७५ वर्षांवरीील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास या योजनांमुळे एसटीकडे प्रवाशांचा ओघ वाढला असला, तरी आर्थिक तुटीचे संकट मात्र कायम आहे. सध्या एसटी महामंडळाला दररोज सुमारे १ ते १.५ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत असल्याची माहिती समोर आली आहे.
कोरोना काळानंतर एसटीची घडी अजूनही पूर्णपणे सावरलेली नाही. कोरोना पूर्व काळात एसटीकडे १८ ते १९ हजार बसेस होत्या; मात्र सध्या ही संख्या घटून सुमारे १२,६०० वर आली आहे. गेल्या चार-पाच वर्षांत कोरोना संकट आणि कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन संपामुळे नवीन बस खरेदी रखडली. परिणामी, ग्रामीण व दुर्गम भागात फेऱ्या कमी झाल्या आणि उत्पन्नावर परिणाम झाला.
राज्य सरकारने महिलांना अर्ध्या दरात प्रवास आणि ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास योजना लागू केल्यानंतर प्रवासी संख्या वाढू लागली. मात्र, वाढत्या प्रवाशांना पुरेशा बसेस उपलब्ध नसल्याने महसुलात अपेक्षित वाढ होत नाही. सवलतींचा भार आणि इंधनदरवाढ यामुळे आर्थिक ताण कायम आहे.



