झुंजार सेनापती | मुंबई
देशातील शेवटच्या घटकापर्यंत दर्जेदार व परवडणारी आरोग्यसेवा पोहोचविणे हेच खऱ्या अर्थाने राष्ट्रनिर्मितीचे कार्य असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञान, संशोधन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून मोठे परिवर्तन घडत असून या नवोपक्रमांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळाला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
लोक भवन येथील दरबार सभागृहात पी. डी. हिंदुजा रुग्णालय यांच्या ‘जीवन वाचवणे आणि निरोगी भारत निर्माण करणे’ या देशव्यापी अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी त्या ऑनलाइन माध्यमातून बोलत होत्या.
राष्ट्रपती म्हणाल्या की, देशात आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती झाली आहे. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत लाखो कुटुंबांना मोफत उपचारांची हमी मिळाली असून ग्रामीण भागात आरोग्य सुविधांचे जाळे विस्तारले आहे. तसेच मिशन इंद्रधनुष्य मोहिमेमुळे बालकांच्या लसीकरणाला गती मिळाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तातडीच्या वैद्यकीय सेवांना प्राधान्य देत रुग्णवाहिका सेवा व ट्रॉमा केअर केंद्रांचा विस्तार करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. मात्र काही अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे आणि औषधे आयातीवर अवलंबून असल्याने ती देशातच तयार करण्यासाठी उद्योग आणि संशोधन क्षेत्राने पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कोविडनंतर मानसिक आरोग्याच्या समस्या वाढल्याचे नमूद करताना त्यांनी एकाकीपणा आणि नैराश्य यांसारख्या समस्यांवर प्रभावी उपाययोजना राबविण्याची गरज व्यक्त केली. मानसिक आरोग्यसेवा हीदेखील प्राथमिक आरोग्य व्यवस्थेचा अविभाज्य भाग बनली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
हिंदुजा हॉस्पिटल समूहाच्या वर्षभर चालणाऱ्या या अभियानांतर्गत दुर्गम व ग्रामीण भागात तातडीच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. समाजातील प्रत्येक घटकाने आरोग्य क्षेत्रातील या प्रयत्नांना साथ दिल्यास निरोगी भारताचे स्वप्न साकार होईल, असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला.



