मुंबई | झुंजार सेनापती l प्रतिनिधी
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कथित विमान अपघातप्रकरणी Directorate General of Civil Aviation (डीजीसीए) विरोधात एफआयआर नोंदवण्यावरून मरीनड्राईव्ह पोलीस ठाण्यात मोठा वाद निर्माण झाला. आमदार रोहित पवार आणि आमदार अमोल मिटकरी यांनी तक्रार दाखल करण्यासाठी धाव घेतली असता पोलिसांनी नकार दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
रोहित पवार यांनी थेट सवाल उपस्थित करत म्हटले, “एफआयआर दाखल करणे हा आमचा कायदेशीर अधिकार आहे. मग डीजीसीएविरोधात तक्रार का घेतली जात नाही? आधी स्टेटमेंट टाइप करायला घेतलं, आणि अचानक थांबवलं का?”
घटनास्थळी पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे आणि रोहित पवार यांच्यात तीव्र शाब्दिक चकमक झाल्याचे चित्र पहाण्यास मिळाले.. “तुम्हाला जे करायचं ते करा, पण एफआयआर नोंदवू शकत नाही,” असे डीसीपींनी सांगितल्याचा दावा रोहित पवार यांनी केला. “या अधिकाऱ्याला कोणाचा फोन आला होता?” असा थेट प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
रोहित पवार म्हणाले, “एरवी छोट्या-छोट्या प्रकरणांवर एफआयआर होतो. मग महाराष्ट्रातील मोठा नेता विमान अपघातात गेला असताना तक्रार का नाकारली जाते? अजितदादांसाठी वेगळे निकष का?”
दरम्यान, बारामती येथील संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा इरादा त्यांनी जाहीर केला आहे. “राज्याच्या उपमुख्यमंत्र्यालाच न्याय मिळत नसेल, तर सामान्य नागरिकाने कुणाकडे जावे?” असा सवाल करत त्यांनी या प्रकरणी सत्ताधाऱ्यांनी स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी केली.
या वादामुळे राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे असून, डीजीसीए आणि पोलिस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.



