झुंजार सेनापती | मुंबई
पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा विभागातील शेतकरी आत्महत्यांचे भीषण वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांनी विधानसभेतील तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिलेल्या माहितीनुसार, या दोन विभागांत एकूण १ हजार ९८७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक नोंद आहे. या भागांत सरासरी दररोज सुमारे तीन शेतकरी आत्महत्या करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शेतकरी आत्महत्यांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आमदार अब्दुल सत्तार, अनिल पाटील आणि जयंत पाटील यांनी सरकारकडे सविस्तर माहितीची मागणी केली होती. त्यावर उत्तर देताना मंत्री जाधव यांनी सांगितले की, २००९ ते २०२५ या कालावधीत राज्यात एकूण २ हजार ७८३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची अधिकृत नोंद आहे.
विशेष म्हणजे, २०२५ या वर्षातच सर्वाधिक २०० आत्महत्या झाल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. राज्यात सर्वाधिक आत्महत्यांची प्रकरणे पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा या विभागांत आढळली असून, एकट्या या दोन विभागांतच १,९८७ आत्महत्यांची नोंद झाली आहे.
कर्जबाजारीपणा, नापिकी, हमीभावाचा प्रश्न, वाढते उत्पादनखर्च आणि नैसर्गिक आपत्ती यांसारख्या कारणांमुळे शेतकरी अडचणीत सापडत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. वाढत्या आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर सरकारने ठोस आणि परिणामकारक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी विरोधकांकडून होत आहे.



