झुंजार सेनापती l मुंबई
राज्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागल्याने विजेच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. वाढत्या मागणीमुळे वीजपुरवठ्यावर ताण निर्माण झाला असून महाराष्ट्रातील काही भागांत दररोज तीन ते चार तास भारनियमन करण्याची वेळ महावितरणवर आली आहे.
महावितरणमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या शुक्रवारच्या संध्याकाळपासून काही ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी भारनियमनाचा अवलंब करण्यात येत आहे. शनिवारी संध्याकाळीही काही भागांत वीजपुरवठा खंडित करण्यात आला.
महावितरणच्या १४ मार्च रोजीच्या दैनंदिन प्रणाली अहवालानुसार सकाळी ११ वाजता, दुपारी ४ वाजता आणि पहाटे ४ वाजता विजेची मागणी पूर्ण करण्यात कंपनीला यश आले होते. मात्र रात्री ८ वाजता विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्याने सुमारे एक हजार मेगावॅटपेक्षा अधिक क्षमतेचे भारनियमन करावे लागले.
राज्यातील तापमान झपाट्याने वाढत असल्याने विशेषतः संध्याकाळच्या वेळी विजेची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते. त्यामुळे महावितरणसमोर पुरवठा सुरळीत ठेवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. ज्या गावांमध्ये वीज गळतीचे प्रमाण जास्त आहे, अशा गावांमध्ये दररोज तीन ते चार तास भारनियमन केले जात असल्याची माहिती आहे.
दरम्यान, रात्रीच्या वेळी सौर ऊर्जेचे उत्पादन पूर्णपणे बंद होत असल्याने आणि आखाती भागातील युद्धस्थितीमुळे वायूआधारित वीजनिर्मितीवरही परिणाम झाल्याने वीजपुरवठा व्यवस्थापन अधिक कठीण झाले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत उष्णतेची लाट कायम राहिल्यास राज्यातील काही भागांत भारनियमन वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.



