झुंजार सेनापती l मुंबई
भटकंती करणाऱ्या मेंढपाळ धनगरांच्या उपजीविकेला स्थैर्य मिळावे तसेच त्यांच्या पारंपरिक मेंढीपालन व्यवसायाला आधुनिकतेची जोड मिळावी, या उद्देशाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) योजनेंतर्गत अर्धबंधिस्त मेंढीपालन प्रकल्पाचा समावेश करण्याबाबत मंत्रालयात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला कृषीमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते.
धनगर बांधव हे राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असून त्यांच्या पारंपरिक व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे ही काळाची गरज असल्याचे कृषीमंत्री भरणे यांनी यावेळी नमूद केले. अर्धबंधिस्त मेंढीपालन प्रकल्पामुळे मेंढ्यांची योग्य निगा राखणे शक्य होईल, मृत्यूदर कमी होईल आणि उत्पादनक्षमतेत वाढ होईल, असे त्यांनी सांगितले. या उपक्रमामुळे मेंढपाळ कुटुंबांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी मोठी मदत होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करावे, लाभार्थ्यांना प्रशिक्षण, तांत्रिक मार्गदर्शन आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.
या बैठकीस कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे अधिकारी उपस्थित होते.



