झुंजार सेनापती l मुंबई : विधानसभेत मंजूर झाल्यानंतर ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’ हे विधेयक आज विधान परिषदेतही बहुमताने मंजूर करण्यात आले. या विधेयकाला शिवसेनेने पाठिंबा देत आपली भूमिका मांडली, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने या विधेयकाला विरोध दर्शविला.
धर्मांतराशी संबंधित गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी स्वतंत्र कायद्याची आवश्यकता असल्याने हे विधेयक आणण्यात आले असल्याचे गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधान परिषदेत स्पष्ट केले. या विधेयकावर विधानसभेत दुपारी २.३० ते रात्री ९.३० वाजेपर्यंत तब्बल सात तास चर्चा झाली होती.
या विधेयकाला शिवसेनेचा पाठिंबा असल्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच जाहीर केले होते. त्यानुसार विधान परिषदेत विधेयक मांडल्यानंतर शिवसेना तसेच सत्ताधारी सदस्यांच्या बहुतांश आमदारांनी विधेयकाला पाठिंबा देत भूमिका मांडली.
शिवसेना आमदार अनिल परब यांनी या विधेयकाचा मुख्य उद्देश काय आहे, तसेच आधीच्या कायद्याच्या तुलनेत नेमके कोणते बदल करण्यात आले आहेत याचे स्पष्टीकरण सरकारने द्यावे, अशी मागणी केली. आमदार सचिन अहीर आणि सुनील शिंदे यांनीही विधेयकाला पाठिंबा देत या कायद्यामुळे बेकायदेशीर आणि जबरदस्तीने होणाऱ्या धर्मांतराला आळा बसेल, असा विश्वास व्यक्त केला.
मागील काही वर्षांत देशात फसवणूक किंवा बळजबरीने एका धर्मातून दुसऱ्या धर्मात धर्मांतर करण्याच्या घटना समोर आल्याने सामाजिक सलोखा आणि सार्वजनिक सुव्यवस्थेवर परिणाम होत असल्याचे सरकारने नमूद केले. या पार्श्वभूमीवर देशातील काही राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही बेकायदेशीर धर्मांतर रोखण्यासाठी ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’ लागू करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
दोन्ही सभागृहांत मंजूर झालेले हे विधेयक आता राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्याकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.



