झुंजार सेनापती l मुंबई
राज्यात महसूल विभागातील सातबारा फेरफार प्रकरणामुळे मोठा घोटाळा उघडकीस आला असून तब्बल दोन लाखांहून अधिक शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. महसूल कायद्याच्या कलम १५५ चा गैरवापर करून जमिनींच्या नोंदींमध्ये परस्पर बदल करण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली असून याबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत माहिती दिली.
या प्रकरणाचा मुद्दा शिवसेना आमदार अॅड. अनिल परब यांनी विधान परिषदेत उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना मंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, पुणे जिल्ह्यातील तपासणीत ३८ हजार २७ प्रकरणांमध्ये फेरफार झाल्याचे आढळले आहे. या प्रकरणात महसूल विभागातील २४७ अधिकारी दोषी आढळले असून त्यांच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
सातबारा उताऱ्यातील नावातील दुरुस्ती, नोंदीतील फेरफार किंवा शुद्धलेखन दुरुस्ती करण्यासाठी असलेल्या कलम १५५ चा गैरवापर करून काही अधिकाऱ्यांनी जमीन मालकीत बदल केल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या माध्यमातून गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी धनिक आणि बिल्डरांच्या नावे वळवल्या गेल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली असून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सात दिवसांत सुरू केली जाईल, असेही मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या प्रकरणामुळे राज्यातील जमीन नोंदी व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.



