झुंजार सेनापती l मुंबई
महाराष्ट्रातील एलपीजी तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज महत्त्वपूर्ण घोषणा केली. ज्या भागांत पीएनजी (पाइप्ड नॅचरल गॅस) सुविधा उपलब्ध आहे, त्या ठिकाणी पुढील तीन महिन्यांत एलपीजीचे वितरण पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात सध्या गॅस सिलिंडरसाठी ठिकठिकाणी मोठ्या रांगा लागत असून, छोट्या हॉटेल्स, टपऱ्या आणि खानावळींवर याचा गंभीर परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी व्यवसाय ठप्प होण्याची वेळ आली आहे.
या पार्श्वभूमीवर सरकारने केरोसिन पुरवठा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांच्या पेट्रोल पंपांवर लवकरच केरोसिन उपलब्ध करून दिले जाणार आहे. सध्या राज्याकडे सुमारे साडेतीन हजार किलोलीटर केरोसिन साठा उपलब्ध असून तो साधारण एक महिना पुरेल, अशी माहिती देण्यात आली.
पूर्वी न्यायालयाच्या आदेशामुळे केरोसिन वाटप थांबवण्यात आले होते. मात्र, सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीचा विचार करून न्यायालयाने केरोसिन वितरणास परवानगी दिली आहे. त्यामुळे अधिकृत डिलर्समार्फतच केरोसिनचे वाटप केले जाणार आहे.
काळाबाजार रोखण्यासाठी सरकारकडून कडक उपाययोजना करण्यात येणार असून केवळ अधिकृत केंद्रांवरूनच केरोसिन विक्री होईल, असेही भुजबळ यांनी सांगितले. तसेच, नागरिकांनी पीएनजीचा वापर वाढवावा, असा आग्रह सरकारकडून करण्यात येत आहे. मात्र, पीएनजी कनेक्शनसाठीचा खर्च ग्राहकांनाच करावा लागणार आहे.
दरम्यान, मध्यपूर्वेतील सुरू असलेल्या तणावामुळे इंधन पुरवठा साखळीवर परिणाम झाला असून, याचाच परिणाम राज्यातील एलपीजी तुटवड्यावर होत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.



