■ झुंजार सेनापती l जालना
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नसल्याने आणि कर्जावरील व्याज परताव्याचा प्रश्न रखडल्याने मराठा आंदोलक यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. येत्या १६ मे रोजी पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची पुढील दिशा आणि तारीख जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कांद्याच्या घसरत्या दरामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून सरकारकडून ठोस निर्णय घेतला जात नसल्याची टीका जरांगे-पाटील यांनी केली. “सरकारकडे वारंवार मागण्या करूनही न्याय मिळत नाही. आता एकजूट हाच पर्याय असून संघर्षाशिवाय न्याय मिळणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत कर्ज घेतलेल्या लाभार्थ्यांना व्याज परतावा वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे राज्यातील तरुणांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
१६ मे रोजी होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे आता राज्यातील शेतकरी आणि मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.



