झुंजार सेनापती l बीड
बीड तालुक्यातील तांदूळवाडी घाट येथील जिल्हा परिषद शाळेत पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग असुन विद्यार्थी संख्या ही जवळपास १२० च्या वरती आहे. वर्ग सात आणि शिक्षक चार अशी असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. शाळेत मंजूर शिक्षक पदे असूनही प्रत्यक्षात शिक्षक नियुक्त न झाल्याने विद्यार्थ्यांना एकाच शिक्षकावर अवलंबून राहावे लागत आहे. परिणामी वर्गनिहाय अध्यापन, सराव व मूल्यमापनावर मोठा परिणाम होत आहे.
शाळेतील विद्यार्थी संख्या लक्षणीय असूनही अपुऱ्या शिक्षकांमुळे अभ्यासक्रम वेळेत पूर्ण होणे कठीण झाले आहे. विशेषतः पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांच्या मूलभूत शिक्षणावर परिणाम होत असल्याने पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. शाळा व्यवस्थापन समिती आणि अनेक पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रारी करूनही अद्याप ठोस कार्यवाही झालेली नाही. गेल्या सहा महिन्यापासून खान नावाच्या अधिकाऱ्यांकडे चकरा मारुन देखील त्यांच्या कडून कुठलीही दखल घेतली जात नाही.
येत्या आठ दिवसाच्या आत तातडीने तीन शिक्षकांनाची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात येत आहे, अन्यथा विद्यार्थी आणि पालकांना सोबत घेऊन आंदोल उभा करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. शिक्षण विभागाने याची त्वरित दखल घेऊन विद्यार्थ्यांच्या हितासाठी शिक्षक उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी अनेक दिवसापासून ग्रामस्थांकडून होत आहे.



