झुंजार सेनापती l मुंबई
महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता राज्यातील प्रमुख शहरांचा नवा महापौर कोण? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, मीरा-भाईंदर आदी महापालिकांसाठी महापौर पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी आज गुरुवारी (दि. २२) सोडत काढली जाणार आहे.
ही सोडत ओबीसी, अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), महिला किंवा सर्वसाधारण गटासाठी निघणार का, यावर राजकीय समीकरणे अवलंबून असल्याने सर्वच पक्षांमध्ये प्रचंड उत्सुकता आणि धाकधूक निर्माण झाली आहे. आरक्षण जाहीर होताच संभाव्य महापौरांची नावे पुढे येणार असून, पक्षांतर्गत हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.
सोडतीच्या निकालावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची रणनीती ठरणार असून, काही ठिकाणी महापौर पदासाठी जोरदार चुरस पाहायला मिळू शकते. विशेषतः मुंबई महापालिकेच्या महापौर पदाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, सोडत प्रक्रियेसाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून, संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. आजची सोडत शहरांच्या राजकारणाला नवे वळण देणार असल्याचे स्पष्ट आहे.



