झुंजार सेनापती l मुंबई
मार्चच्या मध्यावरच तापमान चाळिशीकडे झेपावत असल्यामुळे राज्यातील धरणांतील पाणीसाठ्यावर बाष्पीभवनाचा मोठा परिणाम होत आहे. राज्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सध्या ६०.३७ टक्के पाणीसाठा शिल्लक असून पुढील चार महिन्यांसाठी पाणीपुरवठ्याचे मोठे आव्हान जलसंपदा विभागासमोर उभे राहिले आहे.
राज्यातील विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट पसरली आहे. या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्याचा आढावा घेतला. राज्यात लहान, मध्यम आणि मोठी अशी सुमारे ३ हजार ११ धरणे असून त्यामध्ये सध्या ६०.३७ टक्के पाणीसाठा आहे.
मागील वर्षी याच काळात राज्यातील पाणीसाठा ५३.०६ टक्के होता. काही भागांत पाऊस उशिरा पडणे तसेच अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी पाणीसाठ्यात वाढ झाली असल्याचे जल अभियंत्यांनी निरीक्षण नोंदवले आहे. मात्र वाढत्या उष्णतेमुळे बाष्पीभवनाचे प्रमाण वाढत असल्याने पुढील काळात पाणीसाठ्यांवर लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.
राज्यात सर्वाधिक धरणे संभाजीनगर विभागात असून येथे ९२२ धरणे आहेत. या भागातील धरणांमध्ये सध्या ६३.२७ टक्के पाणीसाठा आहे. नागपूर विभागात ६२.०९ टक्के, अमरावती विभागात ६३.०७ टक्के, तर नाशिक विभागात ६०.५६ टक्के पाणीसाठा आहे. पुणे विभागात ५८.३४ टक्के तर कोकण विभागात सर्वात कमी म्हणजे ५७.७५ टक्के पाणीसाठा नोंदवण्यात आला आहे.
विभागनिहाय पाणीसाठा
नागपूर – ६२.०९ टक्के
अमरावती – ६३.०७ टक्के
संभाजीनगर – ६३.२७ टक्के
नाशिक – ६०.५६ टक्के
पुणे – ५८.३४ टक्के
कोकण – ५७.७५ टक्के
मुंबईसाठी उपलब्ध पाणी
मध्य वैतरणा – ४२.४० टक्के
मोडकसागर – ५४.८९ टक्के
तानसा – ५२.१३ टक्के
भातसा – ५९.१९ टक्के



