झुंजार सेनापती l मुंबई
छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण हिंदुस्थानासाठी वंदनीय आणि प्रेरणास्थान आहेत. मात्र त्यांच्या पुतळ्यांच्या आडून काही समाजकंठक आणि राजकीय स्वार्थी घटक आपले हितसंबंध साधत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. यामुळे समाजात अनावश्यक तणाव निर्माण होऊन सामाजिक सलोखा बिघडत असल्याची चिंता व्यक्त होत आहे.
याबाबत बोलताना श्रीमंत भुषणसिंह होळकर यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा वापर करून समाजात फूट पाडण्याचा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. शिवराय हे सर्व समाजाचे दैवत असून त्यांच्या नावावरून वाद निर्माण करणे म्हणजे त्यांच्या विचारांचा अपमानच आहे.
सध्या विविध ठिकाणी शिवपुतळ्यांवरून वाद निर्माण होत असून काही राजकीय मंडळी त्याचा फायदा घेत असल्याचे चित्र आहे. या घटनांमुळे समाजात अविश्वास आणि द्वेषाचे वातावरण तयार होत आहे.
या पार्श्वभूमीवर तोडगा काढण्यासाठी छत्रपती घराण्याने पुढाकार घेणे गरजेचे असल्याचेही श्रीमंत भुषणसिंह होळकर यांनी नमूद केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे समाजात एकात्मता आणि शांतता प्रस्थापित होऊ शकते, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
सामाजिक ऐक्य अबाधित राखण्यासाठी सर्व समाजघटकांनी संयम राखून शिवरायांच्या विचारांचा आदर्श ठेवणे हीच काळाची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.



