झुंजार सेनापती l प्रतिनिधी l मुंबई : विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीत प्रत्यक्ष मतदानाआधीच चित्र स्पष्ट झाले असून, छाननी प्रक्रियेनंतर ९ पैकी सर्व जागांवर बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने राजकीय पक्षांचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे.
या निवडणुकीसाठी एकूण १७ अर्ज दाखल झाले होते. मात्र छाननीदरम्यान सूचक व अनुमोदक नसल्याच्या कारणावरून चारही अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद ठरले. परिणामी, उर्वरित सर्व उमेदवार हे विविध राजकीय पक्षांचेच राहिले आणि निवडणूक बिनविरोध होण्याची परिस्थिती निर्माण झाली.
राजकीय वर्तुळात या घडामोडींमुळे चर्चांना उधाण आले असून, “निवडणूक प्रक्रिया औपचारिकतेपुरतीच राहिली का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. सत्ताधारी आणि प्रमुख पक्षांनी आपले गणित अचूक बसवल्याचेही बोलले जात आहे.
दरम्यान, एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीतही भाजपच्या प्रज्ञा सातव यांचा अर्ज वैध ठरला आहे. त्या ठिकाणी अपक्ष उमेदवाराचा अर्जही तांत्रिक कारणामुळे बाद ठरल्याने तेथेही बिनविरोध निवडीची शक्यता निर्माण झाली आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ४ मे असून, त्यानंतर सर्व विजयी उमेदवारांची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
वैध उमेदवार:
भाजप : सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार
शिवसेना (शिंदे गट) : डॉ. नीलम गोहे, बच्चू कडू
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) : झिशान सिद्दिकी
शिवसेना (ठाकरे गट) : अंबादास दानवे



