झुंजार सेनापती l नाशिक
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रस्तावित रिंग रोड प्रकल्पावरून नाशिक जिल्ह्यात वातावरण चांगलेच तापले आहे. दरी, मातोरी, मुंगसरे आणि मखमलाबाद परिसरातील जमिनी संपादनाच्या विरोधात शेतकरी आक्रमक झाले असून, प्रशासनाच्या कारवाईविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. न्यायालयात प्रकरण प्रलंबित असतानाच रात्री उशिरा व्हॉट्सअॅपवर मोजणीच्या नोटिसा पाठवून दुसऱ्याच दिवशी सकाळी पोलिस बंदोबस्तात प्रशासन गावात दाखल झाल्याने ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.
मुंगसरे गावात मोजणीसाठी गेलेल्या प्रशासनाच्या पथकाला ग्रामस्थांनी विरोध केला असता पोलिसांनी जोरजबरदस्ती केल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे महिलांनाही धक्काबुक्की व मारहाण झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून, या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जिल्हाभर संतापाची लाट उसळली आहे.
या प्रकरणावरून उबाठा गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “सत्तेच्या मस्तीत सामान्य जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. प्रभू रामाच्या पवित्र भूमीत माता-भगिनींवर हात टाकून सरकार स्वतःच्या विनाशाची नांदी लिहित आहे,” असा इशारा त्यांनी दिला.
“कुंभमेळ्याच्या नावाखाली शेतकरी आणि महिलांना घरात घुसून मारहाण करण्याची मस्ती सरकारला महागात पडेल. प्रशासकीय बळाच्या जोरावर बळीराजाचा आवाज दाबता येईल, या भ्रमात सरकारने राहू नये,” असा घणाघातही दानवे यांनी केला.
दरम्यान, या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता असून शेतकरी संघटना आणि ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. प्रशासनाच्या कारवाईमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी “जमीन आमची… निर्णयही आमचाच!” अशी भूमिका घेत संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.



