■ झुंजार सेनापती l नवी दिल्ली
यंदाच्या मान्सून हंगामावर ‘सुपर एल निनो’चे गंभीर संकट निर्माण होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे देशभरात उष्णतेच्या तीव्र लाटा, वादळे, अवकाळी पाऊस आणि हवामानातील मोठे बदल अनुभवायला मिळू शकतात. मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच वातावरणात अचानक बदल होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
हवामान अभ्यासकांच्या मते, प्रशांत महासागरातील तापमान झपाट्याने वाढत असून त्याचा थेट परिणाम भारतीय मान्सूनवर होऊ शकतो. ‘सुपर एल निनो’ सक्रिय झाल्यास पावसाचे प्रमाण कमी होणे, काही भागात दुष्काळसदृश परिस्थिती तर काही ठिकाणी अतिवृष्टी अशी टोकाची परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
एल निनो म्हणजे नेमके काय?
एल निनो ही प्रशांत महासागरातील तापमान वाढीशी संबंधित नैसर्गिक हवामान प्रक्रिया आहे. साधारणपणे दर तीन ते पाच वर्षांनी तिचा प्रभाव दिसून येतो. मात्र यंदा ‘सुपर एल निनो’ तयार होण्याची शक्यता असल्याने त्याची तीव्रता अधिक असू शकते. याचा परिणाम आशिया, अमेरिका आणि आफ्रिकेसह जगातील अनेक देशांवर होतो.
भारतामध्ये एल निनोचा परिणाम प्रामुख्याने मान्सूनवर दिसून येतो. पावसाचे प्रमाण घटणे, उष्णतेत वाढ होणे आणि शेती उत्पादनावर परिणाम होणे, अशी परिस्थिती यामुळे निर्माण होऊ शकते.
महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा वाढणार?
महाराष्ट्रासह उत्तर आणि मध्य भारतातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. दिवसाबरोबरच रात्रीचे तापमानही वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काही भागात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस आणि वादळी वारेही अनुभवायला मिळू शकतात.
हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, विशेषतः शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामे करण्याचा सल्ला दिला आहे.



