⬤ झुंजार सेनापती l मुंबई
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हाय एकदा आक्रमक भूमिका घेत ३० मेपासून प्रखर उन्हात बेमुदत उपोषण करण्याची घोषणा केली आहे. “देशात कुठेच झालं नाही, असं कठोर उपोषण करणार,” असा इशारा त्यांनी सरकारला दिला.
अंतरवाली सराटी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली. “सरकारला चर्चेसाठी भरपूर वेळ दिला, पण आता कठोर भूमिका घेण्याची वेळ आली आहे,” असे ते म्हणाले.
उपोषणादरम्यान पाणी, अन्न तसेच चप्पलांचाही त्याग करणार असल्याचे सांगताना त्यांनी, “उष्माघातामुळे माझा बळी गेला तर त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकार जबाबदार असेल,” असा थेट इशारा दिला.
“सरकारचा नाहीतर माझा तुकडा पडेल. मराठा समाजाच्या मुलांचा सरकारने अक्षरशः उन्हाळा केला आहे. त्यामुळे आता निर्णायक लढा देणार,” असेही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, उपोषण काळात मराठा समाजातील बांधवांनी अंतरवाली सराटीकडे गर्दी करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. त्यांच्या या घोषणेमुळे राज्यातील मराठा आंदोलन पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत आहेत.



