झुंजार सेनापती l मुंबई
वेतनवाढीचा फरक आणि थकीत मासिक भत्त्याच्या मुद्द्यावरून एसटी कर्मचारी संघटना पुन्हा आक्रमक झाल्या असून त्यांनी राज्य सरकारला थेट अल्टिमेटम दिला आहे. १० फेब्रुवारीपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास राज्यव्यापी संप छेडत एसटी सेवा पूर्णपणे बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर मोठे संकट ओढवण्याची चिन्हे दिसत आहेत.
संघटनांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, सरकारकडून ठोस निर्णय न झाल्यास राज्यभर ‘चक्का जाम’ करण्यात येईल. यासाठी सरकारला तीन दिवसांची अंतिम मुदत देण्यात आली असून कर्मचाऱ्यांच्या संयमाचा अंत झाल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. वारंवार पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याने आता थेट संघर्षाचा मार्ग स्वीकारल्याचा इशाराच कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
संभाव्य संपामुळे लाखो प्रवाशांचे हाल होण्याची भीती व्यक्त होत आहे. संघटनांनी प्रवाशांना पर्यायी नियोजन करण्याचे आवाहन केले असून सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे. चार वर्षांपूर्वीच्या दीर्घ एसटी संपाची आठवण अजून ताजी असताना पुन्हा एकदा राज्य वाहतूक यंत्रणा ठप्प होण्याची भीती निर्माण झाली आहे. आता सरकार काय भूमिका घेते, यावर पुढील संघर्षाची दिशा ठरणार आहे.



