झुंजार सेनापती l धुळे : क्षुल्लक कारणावरून विवाह सोहळ्यात झालेल्या वादाचे रूपांतर भीषण हाणामारीत होऊन तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील घोडेमाल गावात घडली. या प्रकरणी वऱ्हाडींपैकी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुरुवारी सकाळी हा प्रकार घडला.
घोडेमाल येथील विज गोसावी यांच्या मुलीचा विवाह सोहळा होता. त्यासाठी वऱ्हाडी गुजरातमधील सोनगड येथून दोन दिवस आधीच दाखल झाले होते. विवाह सुरू होण्यापूर्वी मंडपात दोन्ही पक्षांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. काही वेळातच या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.
अचानक तीन-चार जणांनी वधूपक्षातील मंडळींवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात सुरेश गिरीगोसावी (५०), साहिल गोसावी (३०) आणि देवेंद्र पवार (३०) यांच्यावर गंभीर वार झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. सागर गोसावी व अन्य एक जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर विवाह मंडपातून पळ काढणाऱ्या कांतीलाल गोसावी, जसवंत गोसावी आणि वाहनचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून पुढील तपास सुरू आहे.



