झुंजार सेनापती | मुंबई | प्रतिनिधी
राज्यातील सुमारे ८६ हजार एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा प्रलंबित थकीत हप्ता अखेर त्यांच्या बँक खात्यात जमा झाला असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक्स पोस्टद्वारे दिली.
सरनाईक म्हणाले की, राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घाम आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याचा हा प्रयत्न आहे. निधीअभावी आणि काही तांत्रिक अडचणींमुळे फेब्रुवारी महिन्यात हप्ता देणे शक्य झाले नव्हते. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून २१० कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली. त्यापैकी १०० कोटी रुपये तत्काळ उपलब्ध झाले असून उर्वरित निधीही लवकरच मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यापूर्वी ऑक्टोबर २०२५ मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या सहमतीने दरमहा सुमारे ६५ कोटी रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली होती.
थकीत हप्ता जमा झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला असून शासनाच्या बांधिलकीचा प्रत्यय आल्याची भावना व्यक्त होत आहे.



