झुंजार सेनापती | जालना
दाभाडी (ता. बदनापूर) येथे विवाहितेवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी जालना जिल्हा व सत्र न्यायालय यांनी पाच आरोपींना प्रत्येकी २० वर्षे सक्तमजुरी आणि ६० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. २८ जुलै २०२२ रोजी रात्री पीडितेला फसवून एका ढाब्यावर नेऊन आरोपींनी अत्याचार केल्याचे न्यायालयाने मान्य केले.
अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश कुपेश विजय मोरे यांनी सरकार पक्षाचा युक्तिवाद व सात साक्षीदारांच्या साक्षी ग्राह्य धरत हा निकाल दिला. संदीप कारभारी कोल्हे, दत्तू कुशाभाऊ खमाटे, बाबासाहेब संतोष कोल्हे, लक्ष्मण बाबुराव सोरमार आणि सुंदरराव किसनराव कोल्हे यांना दोषी ठरविण्यात आले.
सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. वर्षा लक्ष्मीकांत मुकीम आणि अॅड. शशांक ढोकरट यांनी काम पाहिले, तर तपास अधिकारी निशा गुणवंत बनसोड यांची साक्षही निर्णायक ठरली.
पीडिता मानसिक आजाराने त्रस्त असली तरी तिचा बुद्ध्यांक ९५ टक्के असल्याचे नमूद करत तिची साक्ष विश्वासार्ह असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. कठोर शिक्षेमुळे जिल्ह्यात या निकालाचे स्वागत होत आहे.



