झुंजार सेनापती | मुंबई
मराठी साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात आज ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. यंदा विधानमंडळाच्या वतीने ‘जावे विनोदाच्या गावा’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र मराठीच्या गौरवासाठी आयोजित कार्यक्रमालाच तब्बल ९० टक्के आमदारांनी दांडी मारल्याने राजकीय वर्तुळात तसेच सोशल मीडियावर तीव्र चर्चा रंगली आहे.
कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. प्रमुख नेत्यांची उपस्थिती असतानाही बहुतांश आमदार गैरहजर राहिल्याने मराठी भाषेबाबतच्या बांधिलकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
मराठीचा आग्रह धरणाऱ्या उबाठा गटाचे आमदार आदित्य ठाकरे हेही कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याचे समोर आले. त्यामुळे विरोधक आणि सत्ताधारी या दोन्ही बाजूंतील आमदारांवर टीका होत आहे.
दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा केला जातो. मात्र विधानभवनातील मुख्य कार्यक्रमालाच मोठ्या प्रमाणात गैरहजेरी लागल्याने मराठीप्रेम केवळ भाषणापुरतेच मर्यादित आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.



