झुंजार सेनापती l मुंबई
भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या घटनेने राज्य हादरले आहे. या अमानुष घटनेवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत थेट शब्दांत सरकार आणि व्यवस्थेला धारेवर धरले.
“अशा नराधमांना कायद्याच्या प्रक्रियेच्या नावाखाली जिवंत ठेवायचंच कशासाठी? लोकांच्या डोळ्यासमोर हालहाल करून संपवायला हवं,” अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले, “प्रत्येक वेळी घटना घडली की सरकार ‘फास्टट्रॅक’ म्हणतं. पण हा फास्टट्रॅक नेमका किती दिवसांचा असतो, हे कोणी सांगणार का? दोन दिवस चर्चा, मग सगळं थंड — हा नेहमीचा खेळ झाला आहे.”
नसरापूर परिसरात आंदोलन करणाऱ्यांवर लाठीचार्ज झाल्याच्या बातम्यांवरही त्यांनी संताप व्यक्त केला. “आंदोलन करणाऱ्यांवर तत्परता दाखवणारे सरकार, गुन्हेगारांवर तीच कडक कारवाई का करत नाही?” असा थेट सवाल त्यांनी केला.
राज्यात महिलांवरील अत्याचार वाढत चालल्याबद्दल चिंता व्यक्त करत ते म्हणाले, “महाराष्ट्रात कायद्याचा धाक उरलेलाच नाही. वर्षागणिक अशा घटना वाढत आहेत, याचा अर्थ व्यवस्था कुठेतरी पूर्णपणे अपयशी ठरत आहे.”
समाजातील बिघडलेली मूल्यव्यवस्था, सत्तेची वाढती लालसा आणि नियंत्रणाचा अभाव यावरही त्यांनी भाष्य केले. “आज प्रत्येकाला सत्ता हवी आहे, ती गाजवायची आहे. वर जे घडतंय, त्याचं प्रतिबिंब खाली दिसतंय. कोणाचाच कोणावर धाक उरलेला नाही, ही सर्वात धोकादायक गोष्ट आहे,” असे ते म्हणाले.
“ही फक्त एक घटना नाही, महाराष्ट्राच्या ‘लक्ष’ आणि ‘लक्ष्य’ दोन्ही भरकटल्याचं हे लक्षण आहे,” असे सांगत त्यांनी सरकारने तातडीने ठोस आणि सर्वंकष उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली



